Monday, 9 May 2011

कृष्णसख्याच्या कथा - ३ (भगवंतांच्या सेवेची साधनं)


जयपूरचे महाराजा माधोसिंह यांनी वृन्दावनात एक मोठे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. महाराजांचंच काम म्हणून त्याची मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी सुरू झाली. योग्य विधि-विधानपूर्वक जमीन अधिग्रहित करण्यात आली. जागेच्या प्रमाणानुसार मंदिराच्या वास्तुचं आरेखन चित्र बनवलं गेलं. मंदिराचं संकल्पचित्र आणि त्यावरचं नक्षीकाम महाराजांच्या पसंतीला उतरल्यावर मंदिराच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. त्यासाठी खास राजस्थानहून संगमरवर आणण्यात आलं.
मंदिराचं स्वरूप खूप मोठं असल्याने आणि ते प्रत्यक्ष महाराज माधोसिंहांचं कार्य असल्याने त्या कामासाठी मोठ्याप्रमाणावर निधि संकलित करण्यात आलेला होता. आजुबाजुच्या अनेक गावांमध्ये ही बातमी पोहोचताच अनेक गरजु त्या ठिकाणी मजुरीच्या आशेने गोळा झाले आणि त्या सर्वांना तेथे काही ना काही काम मिळालं. या मजुरांमध्ये वृन्दावनमधली एक व्यक्ती कुणाच्याही नकळत सामील झाली. भल्या पहाटे ही व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी, मंदिराच्या बांधकामाच्या स्थानी उपस्थित व्हायची. इतर मजुरांसोबत रांग लावून त्या दिवशी मुकादम जे काम करायला सांगेल ते काम ती व्यक्ती मन लावून करायची आणि दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी जी रोजंदारी मिळेल त्या सगळ्याचे चणे विकत घेऊन सर्वच्या सर्व त्या मजुरांमध्ये वाटून टाकायची. अनेक दिवस हा परिपाठ सुरू राहिला. त्या मजुरांना हा अवलिया त्यांच्यापैकीच एक वाटायला लागला होता.
मंदिराचा पाया व्यवस्थित खणला गेला, त्याचा ओटा नीट बांधला गेला, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला योग्य प्रमाणात पायर्‍या काढल्या गेल्या, ओट्यावर विवक्षित ठिकाणी खांब निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू होऊन थोड्याच दिवसात मंदिराचा प्रेक्षणीय सभामंडप आकाराला येऊ लागला. अशा प्रकारे काम होत होत काही दिवसातच संकल्प चित्राप्रमाणे मंदिर दिसू लागलं. महाराज माधोसिंहांना वेळोवेळी बांधकामात होणार्‍या प्रगतीची माहिती देण्यात येत होती. सभा मंडप आणि गर्भगृह आकाराला येत असताना महाराजांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या जागेवर जाऊन आढावा घेण्याचं निश्चित केलं आणि त्यानुसार ते मंदिराच्या आवारात येऊन दाखल झाले.
महाराजांच्या बांधकामाच्या जागी दाखल होण्याने कुठेही चालू असलेल्या कामात खंड पडला नाही. सर्व मजुर नेहमीप्रमाणेच कामं करत होते. महाराज प्रत्येक ठिकाणी जाऊन झालेल्या कामाचा आढावा घेत होते.  एका ठिकाणी त्यांना इतरांपेक्षा वेगळा मजुर दृष्टीस पडला. इतर मजुरांपेक्षा सुदृढ, गौरवर्णी आणि तेजस्वी असा तो मजुर इतरांपेक्षा खूपच जास्त मन लावून काम करत होता. त्याची प्रत्येक कृती हे मंदिर उत्तमाहून उत्तम बनावं याच हेतूने प्रेरित असल्यासारखी वाटत होती. महाराजांना ही गोष्ट खूपच जाणवली. त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते मनात विचार करू लागले, "हा मजुर कोण असावा? याची वेशभूषा इतरांपेक्षा निराळी आहे, त्याचा देहाकार आणि वर्णही वेगळा वाटतोय. त्याचा कामाचा  झपाटा आणि त्याची कामातली तत्परता बघून फार अचंबा वाटतोय. त्याच्या जवळ जाऊन बघूया तर खरं हा आहे कोण ते?" असं म्हणत महाराज त्या मजुराजवळ गेले. जवळ जाताच त्यांनी त्या व्यक्तीला ओळखले आणि पुढे जाऊन त्यांचे पायच पकडले. तो अवलिया मजुर दुसरा तिसरा कुणी नसून ते होते वृन्दावनातले गोपाळ बाबा!
महाराज गोपाळ बाबांना म्हणाले, "बाबा, इथे उन्हातान्हात मजुरीचं काम का करताय?" त्यावर त्यांनी उत्तर दिलं,
"महाराज, तुम्ही हा इतका मोठा मंदिराचा संकल्प सोडला आहे. यासाठी तुम्ही खूप खर्च करताय. यातून तुम्ही भगवंतांची धनाद्वारे सेवा करताय. आमच्याकडे आमचं स्वतःच भगवंतांच्या सेवेचं साधन आमचं हे शरीरच आहे. तेव्हा आम्ही आमच्या तना-मनाचाच भगवंतांच्या सेवेसाठी वापर करतोय. यात आता अडचण ती कोणती?"
गोपाळ बाबांना आपल्याकडे मजुरीचं काम करताना बघून महाराज माधोसिंह खजिल झाले. त्यांनी बाबांना आपल्याबरोबर जयपूरला गोविंदजींच्या दर्शनासाठी येण्याची विनंती केली. तेव्हा बाबा त्यांना म्हणाल्रे, "महाराज, यार ची इच्छा नाही की मी वृन्दावन सोडून कुठे जावं पण गोविंदजींचं निमंत्रण मी टाळू शकत नाही."
गोपाळ बाबा माधोसिंहांबरोबर गोविंदजींच्या दर्शनाला गेले पण तिथेही फार काळ थांबू शकले नाहीत. आपल्या यार च्या आठवणींनी त्यांना लवकरच पुन्हा वृन्दावनामध्येच दाखल व्हावं लागलं कारण वृन्दावनामधल्या त्यांच्या यारालाही त्यांच्याशिवाय कुठे करमत होतं.

No comments:

Post a Comment