नंदगावातल्या नंदीश्वरमहादेवाजवळच्या यशोदाकुण्डानिकटच्या गुहेमध्ये एक महात्मा बाबाजी खूप दिवसांपासून भजन करत होते. ते कोण होते? त्यांचे नाव काय होतं? ते कुठून आलेले? हे कुणालाच माहिती नव्हतं. खूप वयस्कर असल्यामुळे ते आपल्या या गुहेतून फार बाहेर पडत नसत. संध्याकाळच्या वेळी एकदाच बाहेर पडून शौचादि विधि उरकून ते माधुकरीसाठी गावात जायचे आणि चार घरांमधून जितकी भाकर मिळेल तेवढ्यानेच उदरपूर्ति करून पुन्हा भजनाला बसायचे.
एके दिवशी गोवर्धनच्या एका बाबाजींनी त्यांना चकलेश्वर महादेवाला येण्यासाठी भरीला घातलं आणि दोन दिवस नामयज्ञात सामिल करण्यासाठी तिथे घेऊन गेले. तिसर्या दिवशी तिथून परतल्यावर नियमानुसार ते माधुकरीसाठी गावात गेले. माधुकरी घेऊन पुन्हा गुहेकडे आले तो गुहेच्या तोंडाशीच त्यांना कुणाचे तरी करुण बोल ऐकू आले, "अहो बाबाजी, कुठे होतात तुम्ही? गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही नसल्यामुळे मी उपाशीच राहिलो आहे हो!"
बाबाजींना आजुबाजुला कुणीच दिसेना. त्यांनी आश्चर्याने विचारलं, "आपण कोण आहात? आपला आवाज तर ऐकू येतोय पण दिसत मात्र कुणीच नाही आहे."
"तुम्ही माधुकरी मागून आल्यावर एक भाकर तुकडा इथेच या गुहेच्या तोंडाशी ज्या कुत्र्याला टाकायचात, तोच मी कुत्रा आहे." असं उत्तर त्यांना ऐकू येत असतानाच गुहेच्या दाराशी एक कुत्रा कपारींमागून अवतीर्ण झाला. कुत्रा बोलताना दिसत नव्हता पण त्याच्या मनातील भाव मात्र बाबाजींना स्वच्छ ऐकू येत होते. त्यांनी दयार्द्र स्वरात पुन्हा विचारलं, "तुम्ही कोण आहात? तुम्हाला हे रूप कसं प्राप्त झालं? तुमच्या गतकालीन स्वरूपाबद्दल काही सांगू शकाल काय?"
कुत्र्याच्या मनातील भाव बाबाजींच्या व्याकुळ अन्तःकरणात उमटू लागले. तो कुत्रा त्यांना म्हणाला, "बाबाजी, मी एक अभागी जीव आहे. पूर्वीच्या जन्मी मी या नन्दीश्वर महादेवाचा गुरव होतो. त्या जन्मात माझ्याकडून काही अपराध घडले. मी माझं वर्तनही शुद्ध ठेवू शकलो नाही. माझ्या त्या कर्मांचा परीणाम म्हणून मला हा कुत्र्याचा जन्म मिळाला. त्यातही पूर्वजन्मातील स्मृतिंमुळे मी तुमच्यासारख्या महात्म्यांच्या हातच्या माधुकरीच्याद्वारे स्वतःची उर्ध्व गति साधण्याचा प्रयत्न करत होतो पण माझे हे प्रयत्नही अपुरे पडले आणि सध्या कुत्र्याच्या देहातील भूतयोनीमध्ये मी अडकून राहिलो आहे. तुमच्या हातच्या माधुकरीने मला उर्ध्वगति मिळेल या आशेवर मी इथे आसपास राहतोय."
कुत्र्याचा वृत्तांत ऐकल्यावर कुतुहलवशात् बाबाजींनी विनयपूर्वक विचारलं, "काहीही असलं आणि कशामुळेही असलं तरी तुम्ही एका अप्राकृत धामातील भूत आहात. त्यामुळे तुम्ही श्री श्री जुगलकिशोर आणि त्यांच्या अप्राकृतलीला बघंतच असाल ना?"
"होय बाबा! या लीलांचं दर्शन होतं पण तुम्हा बाबाजींच्याकडून रागानुगा भक्तिच्या अभ्यासाने त्यांच्या रूपाचं आणि लीलांचं ज्याप्रमाणे दर्शन-आस्वादन होतं तसं करण्याची योग्यता माझ्यात कुठली?" तो कुत्रा उत्तरला.
"एकदा मला त्या मुरलीधराचं दर्शन करवू शकाल?" बाबांनी कातर स्वरात विचारलं.
"नाही हो बाबाजी! माझ्यात कुठे आहे असलं काही दाखवण्याची क्षमता?" त्यांना उत्तर मिळालं.
"मग त्यांचं दर्शन कसं करता येईल, हे तर सांगू शकाल?" बाबांनी पुन्हा विचारलं.
"हो, ते सांगता येईल. गोरज मुहूर्तसमयी श्रीकृष्ण आपल्या गायींना कुरणांतून परत आणतात. यशोदाकुण्डाजवळ तुम्हाला त्यावेळी अनेक गुराखी आपापल्या गायींना घेऊन परतताना दिसतील. त्यातला जो सगळ्यात शेवटी असतो ना, तोच गोपाळ आहे." असं सांगून बाबांनी टाकलेला भाकरतुकडा स्पर्शित करून तो कुत्रा कुठेतरी निघून गेला.
आता बाबाजींना गोरजमुहूर्ताचे वेध लागले. त्यांच्याच्याने दुसर्या दिवसापर्यंतचा तेवढा काळ काढणं फारच कठीण झालं. रात्र कशीबशी व्यतित केल्यावर दिवस तर त्यांना जणु खायलाच उठलेला. प्रत्येक क्षण त्यांना एक एक युगासारखा वाटत होता. त्यांचं मन खूपच अधीर झालं. मनात तर्हेतर्हेचे विचार येऊ लागले. श्रीकृष्ण मला खरंच दर्शन देतील? माझ्यावर इतकी कृपा करतील? मी खरोखरच त्यांच्या दर्शनाच्या योग्य आहे का? माझ्यासारख्या कुटिल, पाखंडी व्यक्तीला ते आपलं दर्शन देतील का? या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांच्या विचारात ते कधी रडायचे कधी मूर्च्छित पडायचे. कधी विचार करायचे, श्रीकृष्णांनी माझ्यावर अशी दर्शनाची कृपा नाही केली तरी काहीच हरकत नाही. ते करुणासागर आहेत. पतितपावन आहेत. ते जरूर माझ्यावर आज ना उद्या कृपा करतील आणि ते आनन्दसागरात झुलू लागत. अशाप्रकारे मनाच्या-भावनांच्या कल्लोळांमध्ये दुपार टळली आणि सूर्य मावळतीकडे झुकला. गोरज समय आला आणि दूर क्षितीजावर गायींचे कळप येताना दिसू लागले. बाबाजी जवळच्या झाडींमध्ये लपून बसले. काही वेळातच परीसर गायींच्या आणि वासरांच्या हंबरण्याने आणि त्यांच्या गळ्यांतील घंटांच्या आवाजाने भरून गेला. गुराखी आपापल्या गायी वेगळ्या करून घेताना दिसू लागले. त्याबरोबरच त्यांच्या वाटा वेगळ्या होऊ लागल्याचंही समजून येऊ लागलं. या सर्वांच्या शेवटी एक सावळ्या वर्णाचा बाल गुराखी येताना बाबाजींनी पाहिलं. त्याच्या हातात गुराखी वापरतात तशी काठी होती. त्या काठीच्या साहाय्याने आपल्या गायींना वेगळं करून त्वरेने तो त्यांना नंदगावच्या दिशेने वळवू लागला. तेव्हाच बाबाजींनी उडी मारून त्या मुलाचे पाय घट्ट पकडले आणि त्याला साष्टांग दण्डवत घातला.
तो मुलगा गडबडला. बाबाजींच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत तो त्यांना म्हणाला, "ए बाबा! असं काय करतोयस? बाबाजी असून एका गुराख्याच्या पाया पडतोस होय? सोड, सोड, जाऊ दे मला!"
"दयामय! दया करा! दया करा!", बाबाजी हमसून हमसून रडत म्हणू लागले. त्यांच्या अश्रुंनी त्या बाल गोपाळाच्या पायांना अगदी भिजवून टाकलं. अवरुद्ध कंठाने आणि अस्पष्ट आवाजात बाबाजी काहीतरी बोलू लागले पण लौकिक कानांमध्ये त्या ध्वनीतून कोणताही अर्थबोध होत नव्हता. तो गोपाळ पुन्हा त्यांना बोलला, "बाबा, अरे, वेड लागलंय का तुला? बघ! मला जाऊ दे, उशीर होतोय. माझी आई फटकावून काढेल मला गायींना घरी आणण्यासाठी जास्त उशीर केला तर."
"नाही, नाही, प्रभु! असं माझ्याशी कपट खेळू नका. कृपा करा, दयाघना! दया करा." बाबा म्हणाले.
"अरे बाबा, मीच तुझ्या पाया पडतो पण मला सोड. त्यापेक्षा असं कर, तू माझ्यासोबतच माझ्या घरी चल. मी तुला माझ्या घरनं माधुकरी देतो. लोणी-साखरही देतो. तुला आणखी काय हवं ते देतो, पण मला आता सोड." तो गोपाळ बाबांना समजावत म्हणाला.
खरं तर तो गोपाळ आणि बाबाजी दोघेही एकमेकांच्या स्पर्शांनी पुलकित झाले होते पण श्रीकृष्ण आपल्या स्वभावगत खोडकरपणाला जागून बाबाजींना वेगवेगळी कारणं आणि आमिषं दाखवत होते. तरीही बाबाजींनी स्वतःचा हेका सोडला नाही. ते श्रीकृष्णांच्या आमिषांना बळी पडले नाहीत. आणि भुलणार तरी कसे? त्यांच्या मनात भगवंतांच्या ल्हादिनी शक्तीचा प्रकाश पसरलेला असताना ते शक्यच नव्हतं. खूप वेळ भगवंत आणि त्याचा भक्त यांच्यात भाव-युद्ध सुरू राहिलं पण शेवटी भक्ताच्या प्रेमाचा, त्याच्या प्रेमशक्तीचा विजय झाला. त्याच क्षणाला बाबाजींना जाणीव झाली की एक अवर्णनीय असा सुगंध सभोवार पसरला आहे. असा सुगंध की ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्याचा आस्वाद घेता घेता बाबाजींना अत्यंत कर्णमधुर पण गंभीर शब्द ऐकू आले, "ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं!"
पुढच्याच क्षणी बाबाजींना त्या गोपाळाच्या जागी भगवंतांच्या त्रिभंग - मुरलीधारी रूपाचं दर्शन झालं. त्या मनोहारी दर्शनानंही बाबाजींच्या जीवाची तृप्ती झाली नाही. ते भगवंतांना म्हणाले, "प्रभो, मी युगल उपासक आहे. तुमच्या एकट्याच्या दर्शनाने माझी विरह ज्वाला कशी शांत होईल? एकदा सपरिवार दर्शन देऊन माझ्या तप्त हृदयाला शीतलता द्या, माझ्यावर आणखी येवढी कृपा करा."
तेव्हा बाबाजींच्या भाग्याची परीसीमा झाली आणि त्यांच्यासमोर एका दिव्य प्रकाशाचा उदय झाला. त्यांच्या नजरेसमोरचा प्रकाश तेजस्वी होता पण त्यामुळे त्यांचे डोळे दिपले मात्र नाहीत. त्यातही एक प्रकारचा सौम्यपणा असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं सरावताच बाबाजींना समोर एक सिंहासन दिसलं आणि त्या सिंहासनावर बसलेल्या युगल रुपातील श्रीश्रीराधा-माधवांना बघून त्यांच्या डोळ्याचं पारणंच फिटलं.
काही क्षणांपूर्वीचा त्रिभंग मुरलीधररुपातील श्रीकृष्ण आता युगल रुपात नीलवर्णीय माधव बनल्याचं आणि आपली ल्हादिनी शक्ती श्रीमति राधाराणीच्या शेजारी आनंदात स्थानापन्न झाल्याचं त्यांनी पाहिलं. तापलेल्या सुवर्णाप्रमाणे अंगकांती असलेली राधाराणी त्यांना स्वतःला आपल्या स्नेहार्द्र नजरेने आश्वस्त करत असल्याचं त्यांना जाणवलं. राधा-माधवांच्या दोन्ही अंगांना ललिता सखी आणि विशाखा सखी त्यांनी पाहिल्या. माधवाच्या शेजारी वेगवेगळ्या स्वादिष्ट व्यंजनांचं ताट घेतलेली चंपकलता सखी त्यांनी पाहिली. तिच्या शेजारी रानफुलांच्या माळा घेऊन चित्रा सखी उभी असल्याचं त्यांना दिसलं. राधा-माधवांच्या समोर आपल्या वीणेवर सुरेल झंकार करणारी तुंगविद्या सखी आणि तिच्या शेजारी जमिनीवर वेगवेगळ्या घटामध्ये जिने सुगन्धी वनस्पतींचा धूप केला आहे आणि जिच्याकडे अनेक प्रकारच्या अत्तराच्या कुप्या आहेत अशी रंगदेवी सखी त्यांनी पाहिली. श्रीमति राधाराणीच्या शेजारी हातामध्ये अनेक रत्ने आणि रत्नमाला घेऊन इन्दुलेखा सखी होती तर राधाराणीच्या मागे रंगदेवी सखीचं प्रतिबिंबच जणू अशी असलेली सुदेवी सखी त्यांनी पाहिली.
अष्टसखींद्वारे सेवित युगल सरकारांच्या रूपमाधुरीचं रसास्वादन करता करता बाबाजींच्या चित्तवृत्ती तल्लीन झाल्या. त्यांच्यामध्ये एक अपूर्व असा आनंदावेश उत्पन्न झाला पण चित्तवृत्तींच्या या आवेशाला धारण करण्याची क्षमता बाबाजींच्या जीर्ण देहामध्ये नव्हती. यामुळे बाबाजींनी तो देह त्यागून भगवंतांच्या नित्य लीलांमध्ये प्रवेश केला.